केजरीवाल यांना टोला
नवी दिल्ली : "माझ्या आंदोलनात सहभागी झाल्यानंतर राजकारणात सहभागी होता येणार नाही, माझ्या आंदोलनातून आता नेते निर्माण होणार नाहीत." असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी केले आहे. २३ मार्च २०१८ पासून दिल्ली येथे पुन्हा एकदा अण्णा हजारे यांचे आंदोलन सुरु होणार आहे, त्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी संवाद साधताना आज ते बोलत होते.
"जनलोकपाल आंदोलनाच्या वेळी मी सावध नव्हतो, त्यामुळे त्यावेळी मला काही करता आले नाही, मात्र आता पुन्हा तसे होणार नाही, माझ्या आंदोलनात सहभागी होताना राजकीय पक्षात सहभागी होणार नाही किंवा निवडणूक लढवणार नाही, असे त्या व्यक्तीला लेखी लिहून द्यावे लागेल." असे म्हणत त्यांनी आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केरीवाल यांना टोला लगावला आहे.
अण्णा हजारे हे २३ मार्च २०१८ पासून पुन्हा एकदा दिल्लीत जनलोकपालसाठी आंदोलन करणार आहेत. त्यासाठी त्यांनी आत्तापर्यंत ९ राज्यांचा दौरा केला असून या आंदोलनात अधिकाधिक लोकांनी सहभागी व्हावे यासाठी ते लोकांशी संवाद साधत आहेत. हे आंदोलनदेखील शांततेच्या मार्गाने होणार आहे. यात कोणताही हिंसाचार होणार नाही, असे अण्णा हजारे यांनी स्पष्ट केले आहे.