नवी दिल्ली : समाज माध्यमांतून अफवा पसरतच होत्या ते कमी की काय म्हणून मुख्य प्रवाहातील माध्यमेही यात मागे राहिली नाहीत. त्यांना आळा बसावा म्हणून पीयूष गोयल यांनी गेल्या काही दिवसांत रेल्वेसंबंधी माध्यमांत येत असलेल्या उलटसुलट बातम्यांवर स्पष्टीकरण दिले. ट्विटरवर ट्विट करत त्यांनी या बातम्या म्हणजे निव्वळ अफवाच असल्याचे स्पष्ट केले आहे.
आयआरसीटीसीवरून रेल्वे तिकीट बुक करण्यासाठी फक्त ६ बँकांचे क्रेडिट आणि डेबीट कार्ड अनिवार्य असेल अशी बातमी दोन वेबसाईट्सनी दिली होती. रेल्वे मंत्रालयाने ही बाब खोटी असल्याचे स्पष्ट केले आहे. सणासुदीच्या काळात रेल्वे भाडेवाढ होणार असल्याची बातमी काही वृत्तवाहिन्यांनी दिली होती त्यावर रेल्वे मंत्रालयाने अशी कुठलीही भाडेवाड करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पीयूष गोयल आणि अरुण जेटली यांनी केले आहे.
सरकार दुसर्या नोटबंदीच्या तयारीत असून २ हजारांची नोट सरकारने छापण्यास बंद केले असून आता पाचशे आणि दोनशेच्या नोटाही इतिहास जमा होणार असल्याची बातमी एका वृत्तपत्राने दिली होती. त्यावर अरुण जेटली यांनी ही निव्वळ अफवा असल्याचे सांगत यावर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले. धनादेश बंद होणार असल्याची बातमी एका वृत्तवाहिनीने दिली होती ही सुद्धा अफवाच असल्याचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले. एका वृत्तपत्राने सर्व बँकेतील सेवेवर शुल्क आकारले जाईल, त्यात पासबुक अद्ययावत करणे, खातेधारकाचा पत्ता बदलण्यासारख्या सेवांचाही समावेश आहे, अशी बातमी दिली होती. त्यावर वित्त मंत्रालयाचे सचिव राजीव कुमार यांनी बँकांकडे असा कुठलाच प्रस्ताव आला नसल्याचे स्पष्ट केले आहे. एफआरडीआय या कायद्यानुसार खातेधारकांचे पैसे बँक जप्त करून शकते अशी बातमी आणखी एका वृत्तपत्राने दिली होती. बँकेतील जमा असलेल्या रकम बँक जप्त करणार नसल्याचे अरुण जेटली यांनी स्पष्ट केले आहे.