सहकार भारती स्थापना दिनाच्या निमित्ताने.....

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jan-2018
Total Views |

राष्ट्र पुनर्निर्माणाच्या प्रयत्नात सहकार क्षेत्राचे महत्त्व ओळखून सहकारी चळवळीची गुणात्मक वाढ होण्यासाठी ‘सहकार भारती’ गेली 39 वर्षे ‘बिना संस्कार नहीं सहकार’ या ध्येयाने कार्य करून सेवाभावी सहकारी कार्यकर्त्यांची फळी निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहे. सहकार भारतीची विधिवत नोंदणी दि. 11 जानेवारी 1979 रोजी मुंबईत झाली. त्यापूर्वीच 1978 मध्ये स्थापनेबाबतच्या हालचाली पुण्यातून सरू झाल्या होत्या. सहकार भारतीचे संस्थापक प्रणेते व ज्येष्ठ संघ प्रचारक स्व. लक्ष्मणराव इनामदार यांचे जन्मशताब्दी वर्ष सध्या सुरू आहे. दि. 21 सप्टेंबर 2017 रोजी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत जन्मशताब्दी वर्षाचा शुभारंभ करण्यात आला. सहकार भारती व केंद्रीय कृषी व सहकार मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
 
भारतात प्रामुख्याने महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात सहकार चळवळ रुजली आणि मोठ्या प्रमाणावर वाढलेली दिसते. डॉ. विठ्ठलराव विखे पाटील, धनंजयराव गाडगीळ, वैकुंठभाई मेहता, गुलाबराव पाटील, वसंतदादा पाटील आदींचे सहकारातील योगदानाचे महत्व आपण जाणतोच. सहकार भारतीचे संस्थापक राहिलेले सांगलीचे अण्णासाहेब गोडबोले, सातार्‍याचे लक्ष्मणराव इनामदार, जळगावचे डॉ. अविनाश आचार्य, नागपूरचे वसंतराव देवपुजारी, नाशिकचे मधुकरराव कुलकर्णी, विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष श्री. हरीभाऊ बागडे आदींचेदेखील सहकार भारतीच्या वाटचालीत मोठे योगदान आहे. आज सहकार भारतीच्या देशव्यापी कार्यात असंख्य सुसंस्कारित कार्यकर्त्यांचा सहभाग आहे.
 
महाराष्ट्रात सहकार भारतीच्या कामामध्ये ज्येष्ठ संघप्रचारक कै. तात्या इनामदारांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. कै. अण्णासाहेब गोडबोले यांच्या सहकारातील अद्वितीय कामाची आठवण राहावी म्हणून त्यांच्या कुटुबीयांनी सहकार भारतीला एक विशेष निधी दिला आणि त्यातून त्यांच्या नावाने सहकारातील कार्यकर्त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
 
सहकारी संस्थांमध्ये परस्पर समन्वय, परस्पर पूरकता, आपुलकीची भावना व्यक्त करून एक सुसंघटित सहकार शक्ती उदयास यावी व या शक्तीच्या बळावरच सहकारी क्षेत्रासमोरील प्रश्‍नांची सोडवणूक होऊ शकेल, असा ‘सहकार भारती’चा विश्‍वास आहे. ‘सहकारातून ग्रामविकास’, ‘भारतीय अर्थनीतीचा आधार व्हावा सहकार’, ‘स्वायत्त सहकार- स्वावलंबी भारत’, ‘मुक्त अर्थव्यवस्थेला पर्याय- सहकार’, ‘समृद्ध सहकार- सशक्त भारत’, अशा विविध विषयांवर चर्चा, परिसंवादांचे आयोजन करून ‘सहकार भारती’ने गेल्या 39 वर्षांच्या कालावधीत सहकारी/ आर्थिक क्षेत्रांत मन्वंतर घडविले आहे. सहकारी चळवळ स्वायत्त असली पाहिजे; त्याचप्रमाणे सहकारी संस्थांच्या विकासात अडसर ठरत असलेला सहकारी कायदा बदलला पाहिजे, ही मागणी ‘सहकार भारती’ने सातत्याने केली. कायद्यातील काही तरतुदींचा सहकाराने पुनर्विचार केलेला आपण जाणताच. विविध सहकारी संस्थांच्या अडचणी सोडविण्यासाठी; त्याचप्रमाणे त्यांची पुनर्बांधणी करण्यासाठी ‘सहकार भारती’ नेहमीच अग्रेसर राहिली आहे. सहकार चळवळ पक्षीय राजकारणापासून अलिप्त असली पाहिजे, असेही ‘सहकार भारती’चे आग्रही मत आहे. म्हणूनच ‘सहकार भारची’च्या आतापर्यंत संपन्न झालेल्या अधिवेशनांमधून/ परिसंवादांमधून विविध राजकीय नेत्यांनी आणि सहकार-सामाजिक क्षेत्रांतील तज्ज्ञांनीदेखील याबाबत आपले स्पष्ट मत नोंदवले आहे.
 
‘सहकार भारती’चे कार्य आता देशभरातील 23 राज्यांमध्ये सुरू झाले असून, सर्वच राज्यांमध्ये कार्यकारिणीची स्थापना व नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सहकारी चळवळीची निकोप वाढ व्हावी, सहकारी चळवळीचा प्रचार-प्रसार व्हावा; याबरोबरच देशभरातील प्रत्येक जिल्हास्थानी नागरी सहकारी पतसंस्था गठित व्हाव्यात, स्वायत्त सहकारी कायद्याची तसेच वैद्यनाथ समितीच्या अहवालाची अंमलबजावणी व्हावी, ही उद्दिष्टे निश्‍चित केली आहेत.
 
‘सहकार भारती’च्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त डिसेंबर 2003 मध्ये मुंबईत पहिले राष्ट्रीय महाअधिवेशन संपन्न झाले. या अधिवेशनास देशभरातून 10 हजारांहून अधिक कार्यकर्ते उपस्थित होते. सन 2006 मध्ये दिल्ली, सन 2009 मध्ये भोपाळ, 2012 मध्ये बेंगळुरू, 2015 मध्ये अहमदाबाद येथे राष्ट्रीय अधिवेशन संपन्न झाले. सहकार भारतीने 2012 च्या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्ताने भोपाळ येथे आंतरराष्ट्रीय सहकार परिषद आयोजित केली होती. ज्यामध्ये 13 देशांतील व भारतातील मिळून 1500 प्रतिनिधी उपस्थित होते.
 
महाराष्ट्रातदेखील सहकार भारतीची अधिवेशने खूपच मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाली. सांगली (1981), राहुरी (1984), नागपूर (1986), डोंबिवली (1990), पुणे (1994), जळगाव (1997), पुणे (2000), आळंदी (2011), औरंगाबाद (2011), नाशिक (2014), मुंबई (2017) अशी त्रैवार्षिक अधिवेशने झाली आहेत. याशिवाय सहकारी संस्थांच्या प्रकारांनुसारदेखील अधिवेशने घेतली जात आहेत. त्यांचे एकूणच सहकारी संस्थांच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. 2004 पासून सहकार भारतीने प्रशिक्षणाचीदेखील चांगली व्यवस्था उपलब्ध करुन दिली आहे. जिला आता महाराष्ट्र सरकारने प्रशिक्षणाची शिखर संस्था म्हणून मान्यता दिली आहे.
 
उदारीकरणाच्या आणि जागतिकीकरणाच्या रेट्यामध्ये आर्थिक क्षेत्राला सहकारी चळवळच पर्याय ठरू शकते. मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये सहकार हा एक समर्थ पर्याय आहे, याची पुनर्मांडणी करण्याची गरज आहे. परंतु आवश्यकता आहे ती सहकारी चळवळीतील कार्यकर्त्यांनी एकत्र येण्याची आणि सुसंस्कारित होण्याची तसेच सहकार चळवळीची व्याप्ती व सक्षमता प्रदर्शित करण्याची; ज्यासाठी सहकार भारती अविरत कार्य करीत आहे.
 
सध्या सहकार भारतीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी श्री. ज्योतिंद्रभाई मेहता, राष्ट्रीय सरचिटणीसपदी डॉ. उदय जोशी, राष्ट्रीय संघटनमंत्री म्हणून श्री. संजय पाचपोर आणि संरक्षक म्हणून श्री. सतीश मराठे काम पाहत असून देशभरातून सहकारी संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते असलेली मोठी कार्यकारिणी सहकार भारतीची धुरा समर्थपणे वाहत आहेत.
@@AUTHORINFO_V1@@