औरंगाबाद : केंद्र आणि राज्य शासनाच्या शहरी विकासासाठी असलेल्या विविध योजना प्रभावीपणे राबवून नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रासह शहरांच्या विविध विकासकामांना गती देण्याचे निर्देश खासदार चंद्रकांत खैरे यांनी आज दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित जिल्हा दक्षता व संनियंत्रण समितीच्या बैठकीत खैरे बोलत होते.
बैठकीत स्वच्छ भारत मिशन, हेरीटेज सिटी विकास, अंत्योदय योजना, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी), अटल अभियान (अमृत), स्वच्छ भारत अभियान (नागरी), दीनदयाल अंत्योदय योजना, समांतर जलवाहिनी, भूमिगत गटार योजना, पाणी पुरवठा योजना, औरंगाबाद शहरातील स्मार्ट सिटी योजना, राष्ट्रीय शहरी आरोग्य योजना, रस्ते विकास आदी योजनांचा सविस्तर आढावा खैरे यांनी घेतला. शासनांच्या योजनांचा लाभ वेळेत देण्यासाठी सर्व यंत्रणांनी विकासकामांना प्राधान्य देऊन जनतेला लाभ मिळून द्यावा, अशा सूचनाही त्यांनी केल्या.