पालिकेने लक्ष देण्याची रहिवाशांची मागणी
डोंबिवली : एमआयडीसीतील मिलापनगर तलावाची अवस्था बिकट झाली आहे. एकीकडे या तलावांचे अस्तित्व जपण्यासाठी हरित लवादाकडून गणपती विसर्जन करण्यास बंदी घालण्यात आली होती. मात्र सद्यस्थितीला हे तलाव शेवाळाच्या विळख्यात सापडले आहे.
या तलावात परिसरातील रहिवाशांनी गणपतीचे विसर्जन सुरू केल्याने तलाव जलप्रदूषणाच्या विळख्यात अडकला. गणपती व अन्य दिवशी होणा-या पूजांचे निर्माल्य, व गणेशोत्सव काळात सुमारे हजाराहून अधिक मूर्तीचे तलावात विसर्जन होत होते. बहुतांशी मूर्ती प्लॉस्टर ऑफ पॅरिसच्या असल्याने मुर्ती पाण्यामध्ये विरघळून त्या तलावाचे सौंदर्य नष्ट झाले आहे. तसेच जलचरही नष्ट झाले आहेत. या नंतर हे तलाव स्वच्छ करण्यात यावे किंवा बुजवून टाकण्याची मागणी येथील रहिवाशांनी केली होती. पण सद्यस्थितीला या शेवाळामुळे हे तलाव दुर्लक्षित झाल्याचे पहावयास मिळते.
सणांच्या तोंडावर लाखो रुपये खर्च करण्यात आले नंतर दुर्लक्षितेअभावी या तलावांची दुरवस्था झाल्याचे मत येथील नागरिकांकडून मांडण्यात आले. डोंबिवली शहरात सद्यस्थितीला तलावांचे प्रमाण कमी असून असा तलावांचा होणारा र्हास शहराच्या दृष्टीने घातक असल्याचे ही त्यांचे म्हणणे आहे. या तलावा कडे पुरते दुर्लक्ष झाल्याने या तलावास अवकळा प्राप्त झाली आहे. शहरातील अन्य तलाव नामशेष होत असताना असलेल्या तलावाकडे झालेले दुर्लक्ष आश्चर्यकारक ठरले असल्याचे राजू नलावडे यांच्या वतीने सांगण्यात आले