गुरु गोविंद सिंग म्हणजे भक्ती व शक्तीचा संगम : मुख्यमंत्री

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jan-2018
Total Views |

श्री गुरु गोविंद सिंग यांच्या ३५० व्या प्रकाशपर्व कार्यक्रमाचा समारोप
गुरुद्वाराचे ६१ कोटीचे कर्ज माफ करण्यात येईल


 
 
नांदेड : गुरु गोविंद सिंग यांचे संपूर्ण जीवन हे संघर्षमय असून आपल्या समाजाचे गुलामीपासून व संस्कृतीवर होणारे आक्रमण रोखण्यासाठी आपल्यासह संपूर्ण परिवाराचे बलिदान करुन एक लढवय्या पंथाची स्थापना केली. त्यामुळे गुरु गोविंद सिंग म्हणजे भक्ती व शक्तीचा संगम असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. 
 
नांदेड येथील गुरुद्वाऱ्यामध्ये श्री गुरु गोविंद सिंग यांच्या ३५० व्या प्रकाशपर्व कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी ते काल बोलत होते. यावेळी गुरुद्वारा बोर्डाचे अध्यक्ष आमदार सरदार तारा सिंग, हेमंत पाटील, डॉ. तुषार राठोड, भाजपचे जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर, सचखंड गुरुद्वाराचे संतबाबा कुलविंतसिंगजी, गुरुद्वारा लंगरसाहिबचे संतबाबा बलवंसिंगजी, नांदेड परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, संतुक हबर्डे उपाध्यक्ष स. भुपिंदर सिंघ मिनहास, सचिव स. भागिंदर सिंघ घडीसाज, आदी उपस्थिती होते. 
 
 
 
नांदेड येथील गुरुद्वाराला येऊन गुरुग्रंथ साहिब यांचे दर्शन घेतल्यानंतर नवीन ऊर्जा मिळते. गुरु गोविंद सिंग यांनी या पंथास बलिदानाचे विशेष परंपरा प्राप्त करुन दिली असून त्यांनी स्वाभिमानी समाजाची निर्मिती केली. भक्ती व शक्तीच्या रुपाने गुरु गोविद सिंग यांनी भारताला नवीन मार्ग दाखविल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
 
 
 
राज्य शासनाने गुरु-ता-गद्दीच्या वेळेस गुरुद्वारा बोर्डास कर्जस्वरुपात दिलेले ६१ कोटी रुपयांचा निधी माफ करण्यात येईल, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. तसेच गुरुद्वारा बोर्डाच्या निवासाकरिताच्या भुखंडावर असलेले आरक्षण रद्द करण्याचे आश्वासनही यावेळी त्यांनी दिले. 
 
गुरु गोविंद सिंग यांचा जयंती दिन म्हणजे २२ डिसेंबर रोजी राज्यात राज्य शासनामार्फत सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याबाबतची प्रक्रिया पूर्ण करुन निर्णय घेण्यात येईल, असे सांगून गुरुद्वारा परिसरातील सर्व प्रकारची मद्य विक्रीची दुकाने बंद करण्याची कारवाई लवकरच करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
 
 
प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुग्रंथ साहिबचे दर्शन घेतले. त्यावेळी पंचप्यारे साहिबांच्यावतीने गुरुद्वाराचे मुख्य जत्थेदार संतबाबा कुलवंतसिंगजी यांनी फडणवीस यांचा पारंपरिक पद्धतीने केसरी चोला, पगडी, शिरोपा देऊन सत्कार केला. यावेळी गुरुद्वारा बोर्डामार्फत तयार करण्यात आलेल्या महाराष्ट्र गौरव विशेषांकाचे लोकार्पण फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. 
@@AUTHORINFO_V1@@