अग्रलेख : धडक कारवाई आवश्यक

    26-Apr-2017
Total Views |


 

काश्मीरच्या संदर्भात आता अधिक कठोर पावलं उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. काश्मीरमधील मुस्लिमांना ३७० कलमान्वये विशेष भेट देऊन जी मोठी चूक करण्यात आली, ती सुधारण्याची वेळ आली आहे. आज काश्मीरसाठी भारत सरकारकडून मोठ्या प्रमाणात अनुदान दिले जात आहे. पैसा आणि अन्य प्रकारची मदत पाठवून आपण काश्मिरी लोकांना मुस्लिमांना जिंकून घेऊ असा जर कोणाचा होरा असेल तर त्याला वेळीच सावध करणे गरजेचे आहे. आज काश्मिरात जी परिस्थिती निर्माण झाली आहे, ती लक्षात घेता भारत सरकारने कठोर भूमिका घेणे आवश्यक आहे. पाकिस्तानच्या चिथावणीवरून काश्मिरातील माथेफिरू तरुण भारतीय जवानांवर दगड फेकत आहेत, त्यांच्या जिवाशी खेळत आहेत. सुरक्षा दलाच्या वाहनांना घेरून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न करीत आहेत. असे असतानाही मानवाधिकाराच्या नावाखाली आमच्या जवानांचे हात बांधून ठेवण्यात आले आहेत. माथेफिरू तरुणांनी आमच्या जवानांवर दगड फेकायचे, जवानांना घेरून त्यांना मारहाण करायची अन तरीही जवानांनी जवळ असलेले शस्त्र बाहेर न काढता चुपचाप मार सहन करायचा, हा प्रकार योग्य नाही. आमच्या जवानांना मानवाधिकार नाही? आमच्या जवानांना आत्मसन्मान नाही? आमचे जवान माथेफिरूंचा मुकाबला करू शकत नाही? आमचे जवान आमची शान नाही? आमच्या जवानांच्या जिवाची काहीच किंमत नाही? आमच्या जवानांच्या मनात राष्ट्रभती ओतप्रोत भरलेली नाही? या प्रश्नांची उत्तरं शोधा अन मग निर्णय घ्या.

जवानांनी कोणावरही उगाचच हात उगारू नये, गोळी झाडू नये, इथपर्यंत ठीक आहे. पण, जवळ शस्त्रास्त्रे आहेत आणि जिवाला धोकाही आहे, अशा स्थितीतही जवानांनी गप्प बसावे, हा कसला आला मानवाधिकार? आमचा हिंसाचारावर अजिबात विश्वास नसला तरी गोळीचे उत्तर गोळीनेच दिले पाहिजे, जशास तसे तरी वागले पाहिजे, हीच भूमिका भारत सरकारने घेतली पाहिजे अन सैन्याचे मनोबल उंचावले पाहिजे. पाकिस्तानकडून पैसे घेऊन काश्मिरातील काही तरुण आमच्या सुरक्षा जवानांच्या गाडीला घेराव घालतात, त्यांच्या गाडीवर दगड फेकतात, एवढेच काय तर अगदी जवळून काठ्यांचा प्रहार करतात, काही तरुण तर चक्क जवान प्रवास करीत असलेल्या वाहनांच्या बोनेटवर चढून नाचतात, जवानांच्या पौरुषाला आव्हान देतात अन तरीही आमचे जवान संयमाचा परिचय देत शांत बसतात. कारण? कारण एकच आणि ते म्हणजे या पत्थरबाज देशद्रोही काश्मिरी मुस्लिम तरुणांच्या मानवाधिकाराचे उल्लंघन होऊ नये. एकदा जवानांना मोकळीक द्या अन मग बघा, काश्मिरी तरुण कोणावर दगड फेकतात ते.

आजच्या घडीला काश्मीर खोर्‍यात तीनशेपेक्षा जास्त व्हॉटस अ‍ॅप ग्रुप असे आहेत की ज्यावरून केवळ आणि केवळ काश्मिरी तरुणांची माथी भडकवली जात आहेत. काहीही कारण नसताना भारत सरकारविरुद्ध तरुणांना चिथावणी देण्याचे पाप पाकिस्तानकडून केले जात आहे. ही बाब लक्षात घेता काश्मिरातील इंटरनेट सेवा काही काळासाठी खंडित ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागला तरी सरकारने देशहित समोर ठेवून तो घेतला पाहिजे. काश्मिरात जी दगडफेक आणि हिंसाचार होत आहे, तो आज पहिल्यांदा झालेला नाही. याआधीही अनेकदा हिंसाचार झालेला आहे. काय धडा घेतला आम्ही त्यापासून? काहीच नाही. घेतला असता तर पुन्हा पुन्हा दडग फेकणची हिंमतच झाली नसती काश्मिरी मुस्लिम माथेफिरू तरुणांची.

काश्मिरातील जनतेला पैसा पाठवा, त्यांना मोठ्या प्रमाणावर सोईसुविधा पुरवा अन बदल्यात त्यांचे प्रेम मिळवा, हे आधीच्या सरकारांनी चालविलेले धोरण आता थांबविणे गरजेचे आहे. चुलीत गेला मानवाधिकार असे म्हणत जगाला हे दाखवून देण्याची गरज आहे की आमच्या जवानांवर जे दगड फेकतील, आमच्या सार्वभौमत्वावर घाला घालण्याचा जे प्रयत्न करतील त्यांना आम्ही नेस्तनाबूत केल्याशिवाय राहणार नाही. आमच्या जवानांच्या मानवाधिकाराचे पत्थरबाजांच्या माध्यमातून पाकिस्तानकडून जेव्हा उल्लंघन केले जाते, तेव्हा कुठे वाळून चोच खुपसून बसले असतात हे मानवाधिकारवाले? गतकाळात भारत सरकारने पाकिस्तानात घुसून सर्जिकल स्ट्राईक करीत अतिरेक्यांचे अड्डे जसे उद्ध्वस्त केले होते, तशी आक्रमक कारवाई पुन्हा करण्याची अन पाकिस्तानला कायमचा धडा शिकविण्याची वेळ आली आहे. संपूर्ण जगाला मानवाधिकाराचे धडे देणारी अमेरिका स्वत:वर संकट आल्यानंतर मानवाधिकाराचा कसलाही विचार न करता ज्याप्रमाणे दुसर्‍या देशातल्या अतिरेक्यांच्या अड्ड्यांवर बॉम्ब हल्ले करते, तसेच हल्ले आता भारताने पाकिस्तानात घुसून करण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे काश्मिरातील जे फुटीरवादी नेते भारत सरकारच्या सवलतींचा वापर करूनही पाकिस्तानशी निष्ठा बाळगतात, अशा नेत्यांच्या मुसक्या आवळून त्यांना पार मिझोरमसार या राज्यांमधील कारागृहांमध्ये नेऊन डांबले पाहिजे. बि‘टिश राजवटीत गोर्‍या साहेबांनी कारण नसताना आमच्या वीर सावरकरांना काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावली होती अन अंदमानातील काळकोठडीत डांबले होते, तसे काश्मिरातील फुटीरवादी अन देशद्रोही नेत्यांना काळकोठडीत डांबण्याची हीच योग्य वेळ आहे. असे केले नाही तर कट्टरवादी मानसिकता असलेली ही मंडळी भारत सरकारला कधीच स्वस्थ बसू देणार नाही. आमच्या शूर जवानांचे बळी घेत राहील, काश्मीर खोर्‍यात अशांतता माजवत राहील अन भारताच्या सार्वभौमत्वाला धोका निर्माण करीत राहील, हे लक्षात घेतले पाहिजे. समोरचा शांतता निर्माण करू पाहतो आहे हे माहिती असल्याने कट्टरपंथी आपल्याला अधिक त्रास देतील, कारण त्यांना शांतता नकोच आहे. ज्यांनी ज्यांनी काश्मीरमध्ये सत्ता उपभोगली आहे, त्यांनी सदासर्वदा भारत सरकारकडूनच अपेक्षा केल्या अन त्या पूर्णही करून घेतल्या. अब्दुल्ला असोत वा मग मुफ्ती मोहम्मद सईद, या सगळ्यांनी भारत सरकारला वेळोवेळी ब्लॅकमेल केले आहे. ही सगळी परिस्थिती लक्षात घेता भारत सरकारने आधी एक पाऊल उचचले पाहिजे अन ते हे की काश्मीरपासून वेगळे करीत जम्मू-लद्दाखला राज्य बनविले पाहिजे. तीन वर्षांपूर्वी भाजपाला जो जनादेश मिळाला अन त्यानंतर भारताला जे वैश्विक समर्थन मिळाले, ते लक्षात घेता भारत सरकारला असा धूर्तपणाचा निर्णय घेणे अवघड नाही. उपद्रवमूल्य सिद्ध केले तर शत्रूलाही धडकी भरते. त्यामुळे आता निर्णायक पाऊल उचलताना भारत सरकारने जराही मागेपुढे पाहू नये, अशी अपेक्षा करणे चूक ठरणार नाही.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.